मध्य प्रदेशातून हत्याराची तस्करी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दोघांना अटक , तीन पिस्टल आणि नऊ जिवंत काडतूस जप्त
नाशिक प्रतिनिधी
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात हत्याराची तस्करी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दोघांना शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने अटक केली आहे. या दोघांकडून तीन पिस्तूल आणि नऊ जिवंत काढतुस जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची माहिती तपासली जात आहे.
मध्य प्रदेशातील वरला गावाकडून महाराष्ट्रात हत्याराची तस्करी होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी मध्य प्रदेशातून येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी वाढवत गस्त वाढवली .या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर तसेच दहिवद गावाजवळ वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी त्यांना एम एच 41 डीजे 08 39 क्रमांकाच्या दुचाकीवरून दोघेजण येत असल्याचे दिसले. पोलीस पथकाला पाहून दुचाकी स्वाराने गाडी अन्य रस्त्यावरून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस पथकाने पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची प्राथमिक चौकशी केली असता नाशिक उपनगर भागातील टाकळी रोडवरील रामदास स्वामी नगरात राहणारा शशिकांत अहिरे आणि नांदगाव तालुक्यातील हिसवड बुद्रुक येथे राहणारा प्रफुल्ल भानुदास जगताप अशी या दोघांची नावे असल्याची माहिती पुढे आली .पोलीस पथकाने सुरू केलेल्या चौकशीत या दोघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीचे पिस्टल आणि नऊ जिवंत काढतुस आढळून आले. त्यामुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले .या प्रकरणात पोलीस नाईक पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .दरम्यान आज पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. अटक केलेल्या दोघा आरोपींनी यापूर्वी देखील मध्यप्रदेशातून अशाच प्रकारे हत्यारांची तस्करी केल्याचा पोलिसांना संशय असून याबाबतची माहिती तपासली जात आहे.
0 Comments